Menu

राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली ?

image By Wayam Magazine 07 November 2022

१५ ऑगस्टला झेंडावंदन करताना आपण आपली प्रतिज्ञा म्हणतो. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली, माहितीये? वाचा, ‘वयम्’ मासिकात २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख, आज पुन्हा! ही माहिती ज्यांनी शोधून काढली ते लेखक नरेंद्र लांजेवार यांचं फेब्रुवारीत, वयाच्या ५३व्या वर्षी दुर्दैवी निधन झालं.मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी त्यांनी खूप काम केलं आहे. ते आपल्या ‘वयम्’चे अगदी पहिल्यापासून प्रतिनिधी व चाहते होते. त्यांनी हा लेख खास आपल्यासाठी लिहिला होता. तो लेख त्यावेळी शाळाशाळांमध्ये वाचला गेला व फलकावर लावला गेला होता.

देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एक समान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली, कधी लिहिली, ती केव्हापासून देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली- याची माहिती जवळपास कुणालाच दिसत नाही. मला बालपणापासून हा प्रश्न पडला होता की, आमची ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल? कारण या प्रतिज्ञेच्या खाली कोणाचेच नाव नव्हते. मला शिकवणाऱ्या बऱ्याच शिक्षकांना मी हा प्रश्न विचारला, परंतु मला उत्तर मिळाले नाही. पुढे मी बऱ्याच विद्वान व्यक्तींशी याबाबत चर्चा केली, पण त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. याबाबत काही संदर्भ अधिकृतरित्या मिळत नव्हते. मग मी कसून संशोधन केले, तेव्हा कुठे ही माहिती हाती लागली-

आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी मुळात १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा लिहिली होती. ते आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपथीं गावचे राहणारे होते. संस्कृत, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले होते. ते विशाखापट्टणम् या जिल्ह्याचे अनेक वर्षं ‘जिल्हा कोषागार अधिकारी’ म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांच्या काही कविता, कादंबऱ्या, कथासंग्रहसुद्धा गाजले होते. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून एक प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली.

त्यांच्या एका शिक्षण खात्यातील मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी.व्ही.जी. राजू यांच्याकडे ही प्रतिज्ञा पाठवली. शिक्षणमंत्र्यांनी ही प्रतिज्ञा शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला. केंद्र सरकारच्या नेतृत्वात मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षणखाते काम करत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी ‘डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया’ या समितीची स्थापना केलेली असते. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात.

या ‘डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इंडिया’ची एकतिसावी मिटिंग तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११ आणि १२ ऑक्टोबर १९६४ मध्ये बंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तान्तामध्ये- ‘Development of Education in India: A Historical Survey of Educational Documents before and after Independence’ या पुस्तकाच्या पान १४० वर मुद्दा क्रमांक १८ मध्ये उल्लेख आढळतो की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित राहण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये, तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी.

याकरिता पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली ‘India is my country, All Indians are my brothers and sisters…’ ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढे असेही सूचित करण्यात आले की, ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून सर्वत्र लागू करावी. या प्रतिज्ञेचे देशपातळीवर विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला.आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते, तसेच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जावी. या प्रतिज्ञेच्या खाली त्यांचे नाव असणे गरजेचे आहे.

-नरेंद्र लांजेवार
l_narendra2001@yahoo.com


ऑगस्ट २०२२ ‘वयम्’
(ग्रंथपाल, भारत विद्यालय-बुलडाणा)

My Cart
Empty Cart

Loading...