Menu

‘वयम्’विषयी

Image not found

Box Image not found ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे. ‘वयम्’चे ब्रीदवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात.


शालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाइट, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून हे मासिक सुरू केले आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ ‘वयम्’मध्ये लिहितात. प्रत्येक महिन्याला एका ताज्या विषयाला बहुअंगाने भिडणारे लेखही यांत असतात. ‘वयम्’मधील बहुतांश मजकूर मराठीत असतो आणि एक-दोन लेख/गोष्टी इंग्रजीतून असतात. रंगीत टीव्ही बघणाऱ्या आणि संगणक वापरणाऱ्या पिढीतील मुलांना आकर्षक वाटावे आणि त्यांच्यावर उत्तम डिझाइनचा संस्कार व्हावा, यासाठी आवर्जून उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत छपाई केली जाते. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव ‘वयम्’चे सुलेखन करतात. एकंदर निर्मिती- मूल्यांकडे लक्ष दिले जाते. 'वयम्' मासिकाच्या मुख्य संपादक शुभदा चौकर आहेत.

‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत- डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ.आनंद नाडकर्णी, डॉ. उदय निरगुडकर आणि राजीव तांबे. शिवाय, डॉ. बाळ फोंडके, भारत सासणे, सुबोध जावडेकर, माधुरी पुरंदरे, गणेश मतकरी, मुकुंद टाकसाळे, प्रवीण दवणे, दासू वैद्य, डॉ. शरद काळे, डॉ. नंदिनी देशमुख, श्रीकांत बोजेवार, समीर कर्वे, श्रीराम शिधये, डॉ. उज्ज्वला दळवी, मकरंद जोशी, मेधा आलकरी असे अनेक नामवंत लेखक ‘वयम्’च्या यादीत आहेत.

सलग दहा वर्षांत ‘वयम्’ दिवाळी अंकाला विविध पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प.), कोकण मराठी साहित्य संघ (को.म.सा.प.), कल्याण सार्वजनिक वाचनालय, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, साप्ताहिक उल्हास प्रभात, दिन्मार्क पब्लिकेशन या संस्थांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

Shrikant Bapat Image not found

बापट श्रीकांत शंकर
जन्म: ५ नोव्हेंबर १९४४
नांदिवडे - जयगड, जिल्हा- रत्नागिरी

श्रीकांतजी त्यांच्या व्यवसायामधे अत्यंत व्यग्र असूनही सामाजिक कार्यात विशेष रूची घेतात. आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ वरवडे (जि. रत्नागिरी) गांवात त्यांनी ज्युनियर कॉलेजपर्यंत साकारलेलं ज्ञानमंदिर जिथे आज ३००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात ही त्याची साक्ष आहे. तसंच कंपनीच्या माध्यमातून ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्ससाठी पुण्याच्या स.प. महाविद्यालयामधे मार्गदर्शन केलं जातं. याचबरोबर ॲनॅलिटीकल इन्स्ट्रुमेंटच्या पदव्युत्तर पदविकेसाठी ठाण्याच्या बेडेकर कॉलेजला भरीव सहकार्य केलं जातं. लहान मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते ‘वयम्’ नावाच्या एका आदर्श मासिकाचं प्रकाशन करतात ज्याची सभासदसंख्या ६५०० एवढी आहे. तसेच या मासिकाला आजवर अनेक स्थानिक आणि राज्य पुरस्कार लाभले आहेत. गरजू युवा बॅडमिंटनपटूंना ते आर्थिक सहाय्य करतात. दापोलीतील वणौशी सारख्या निसर्गरम्य ठिकाणी क्रीडाप्रेमींसाठी ‘मिनी स्पोर्ट्स कॉम्पलेक्स’ देखील त्यांनी सुरु केला आहे.


‘वयम्’ परिवारातील साहित्यिक

‘वयम्’ मध्ये काय वाचाल ?

पालकांचा अभिप्राय

My Cart
Empty Cart

Loading...